काम करता करता मरण यावं असं का म्हणाल्या..? ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी

मुंबई (प्रतिनिधी) - ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी आपल्या दमदार अभिनयाने मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. वयाच्या ७९ व्या वर्षीही त्या कार्यरत असून, विविध मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत उषाताईंनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त करत सांगितलं, "माझी इच्छा आहे की मला काम करत करतच मरण यावं. त्यामुळे कोणालाही माझ्यामुळे त्रास नको. मी आजारी पडले तर मुलाला त्रास होईल... तो त्याच्या बायको - मुलीकडे बघणार की माझ्याकडे ?"
उषा नाडकर्णी अलीकडे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. गेल्या वर्षी त्यांच्या भावाचे निधन झाले आणि त्यानंतर त्या अधिकच एकट्या झाल्या आहेत. विविध मुलाखतींमध्ये त्या वारंवार आपले दुःख उघडपणे मांडतात. त्यांचा मुलगा सध्या कामानिमित्त आपल्या पत्नी आणि मुलीसोबत परदेशात स्थायिक असून, त्यामुळे उषाताई मुंबईत एकट्याच राहतात.
उषा नाडकर्णी पुढे म्हणाल्या की, माझ्या शेजारी एक बंगाली कुटुंब राहतात. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं आहे – ‘आंटी, काहीही झालं तरी सांगायला लाजू नका, मध्यरात्रीसुद्धा बिनधास्त फोन करा’. हे ऐकून हृदयाला थोडासा दिलासा मिळतो. कधी घरात पडलो तरी कोणाला समजणार नाही, ही भीती वाटते.
अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी अनेक गाजलेल्या भूमिका साकारल्या आहेत. ‘पवित्र रिश्ता’, ‘खुलता कळी खुलेना’, ‘सुंदर आमचे घर’, ‘मोलकरीण बाई’ यांसारख्या मालिकांमध्ये त्यांचे काम विशेष गाजले. तसेच, ‘देऊळ’, ‘माहेरची साडी’, ‘नशीबवान’, ‘अगडबम’, ‘धुमाकूळ’, ‘पक पक पकाक’ यांसह अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांतही त्या झळकल्या आहेत.
उषा नाडकर्णी यांचा अभिनयाचा प्रवास जितका प्रेरणादायक आहे, तितकाच त्यांचा एकाकीपणा भावनिकतेची जाणीव करून देतो. त्यांच्या आयुष्यातील या टप्प्यात त्यांना अधिक सहकार्य आणि आपुलकीची गरज आहे, हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवतं.