संजय राऊत यांनी केला खळबळजनक आरोप,वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची मंतरलेली शिंगं
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीस शपथ घेतल्यापासून अजूनही मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी गेले नााहीत. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे फडणवीस का जात नाहीत? त्यांना कशाची भीती आहे? असा सवाल करत आहे. अशातच वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची मंतरलेली शिंग पुरल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर का जात नाहीत ?
देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर का जात नाहीत. शपथ घेऊन इतके दिवस झालेतरी फडणवीस का जात नाहीयेत. महाराष्ट्रालाही याची चिंता लागून राहिली आहे. शिंदे गटातील सगळे लिंबूसम्राट आहेत. माझ्या असं कानावर आलंय, भाजपच्या गोटात चर्चा आहे की वर्षा बंगल्या बाहेरच्या लॉनमध्ये खोदकाम करून कामाख्या देवीला कापलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत. अशी त्यांचीच लोक सांगत आहेत. हे खरं आहे की खोटं आहे? आम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नसून अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे आहेत. कामाख्या मंदिरात रेडे कटिंग झालं, तिथून मंतरलेली शिंग आहेत ती पुरली आहेत. मुख्यमंत्रिपद दुसऱ्या माणसाकडे टिकू नये असं तिकडला कर्मचारी वर्ग सांगत असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्र हा पुरोगामी आहे, महात्मा फुले, संत गाडगे महाराज, प्रबोधनकार ठाकरे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विरूद्ध काम करणारे सगळे लोक यांनी अंगारे, धुपारे, चमत्कार, हुंडा याविरोधात काम केलं आहे. पण गेल्या दोन अडीच वर्षामध्ये अंधश्रद्धेसंदर्भात प्रचंड चर्चा व्हायला लागल्या आहेत. हे अत्यंत चुकीचं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.