तहसिलदारांनी येत्या शुक्रवारपर्यंत सूक्ष्म नियोजन करावे -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

तहसिलदारांनी येत्या शुक्रवारपर्यंत सूक्ष्म नियोजन करावे  -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

 कोल्हापूर प्रतिनिधी :- मुबारक आत्तार 

कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थितीला योग्यरित्या सामोरे जाता यावे याकरिता पूरबाधित तालुक्यातील तहसिलदारांनी पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्याबाबत येत्या शुक्रवारपर्यंत सूक्ष्म नियोजन (मायक्रो प्लॅनिंग) करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात संभाव्य पूरस्थिती पूर्वतयारी आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, येत्या 1 जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येणार असून याचा 1077 हा टोल फ्री क्रमांक राहणार आहे. पूरबाधित तालुक्यातील नागरिकांसाठी काही अतिरिक्त साहित्य लागणार असेल तर येत्या शुक्रवारच्या बैठकीत तहसिलदारांनी त्याची मागणी करावी. त्याचबरोबर डोंगरी तालुक्यातील भागामध्ये विजा कोसळण्याचे प्रमाण अधिक असते त्यामुळे “दामिनी ॲपव्दारे” संबंधित यंत्रणा व नागरिकांनी कार्यरत रहावे. जिल्ह्यात सद्या काही नवीन अधिकारी बदलून आले असून त्यांनी पूरस्थिती बाधित गावांची त्वरित बैठक घ्यावी. आपत्ती व टंचाईमध्ये सर्व अधिकाऱ्यांनी आपापसात योग्य तो समन्वय ठेवावा. कोणीही हलगर्जीपणा करु नये. हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी या बैठकीत दिला.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण म्हणाले, पूरबाधित नागरिकांसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोळ या पंचायत समितीमध्ये, गोसरवाड उपकेंद्र, कवठे बुलंद व सर्व तालुका कार्यालयामध्ये पूरबाधित नागरिकांकरिता बफर स्टॉक स्वरुपात औषध साठा साठवला असून बाधित ग्रामपंचायतींनी नागरिकांसाठी रेशन, औषधसाठा हे पुरेशा प्रमाणात साठवून ठेवावे. त्याचबरोबर नागरिक व पशुधन सुर‍क्षित राहण्यासाठीचे नियोजन करावे. जिल्ह्यातील सुमारे 690 गावांच्या पाणीपुरवठा योजना या नदीवरुन असल्याने पूर कालावधीत नागरिकांना दुषित पाणीपुरवठा होणार नाही, याचे नियोजन ग्रामपंचायतीने आत्तापासूनच करावे.

तर पूरबाधित गावांमध्ये यापूर्वी नागरिकांसाठी देण्यात आलेले लाईफ जॅकेट, जनरेटर्स, मशिन्स, बोट आदींची पूर्व चाचणी घेण्यात यावी, जेणेकरुन आपत्ती कालखंडामध्ये अडचण येणार नाही. तसेच आपत्ती संदर्भातील व्हॉटस् ॲप किंवा ई-मेलवरुन जिल्हा प्रशासनाला पाठविलेल्या पत्राची एक कॉपी आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाला देण्यात यावी, अशी सूचना आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी केली.

या आढावा बैठकीसाठी अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, राधानगरी-कागलचे उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे, प्रांताधिकारी श्रीमती वसुंधरा बारवे, मौसमी बर्डे-चौगुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, कार्यकारी अभियंता (पाटबंधारे) रोहित बांदिवडेकर, एमएसईबीचे श्री. कोळी, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. आंबोकर, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय.ए.पठाण यांच्यासह आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, उपप्रादेशिक परिवहन, महावितरणसह इतर विभागाचे अधिकारी-कर्मचारी प्रत्यक्ष तर पूरबाधित तालुक्यातील तहसिलदार, मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी हे दूरदृश्य प्रणालीव्दारे या बैठकीसाठी उपस्थित होते.