दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदी भालचंद्र पाटील यांची निवड

दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदी भालचंद्र पाटील यांची निवड

जयसिंगपूर (प्रतिनिधी) - दक्षिण भारत जैन सभेच्या घटनेतील तरतुदीनुसार सभेच्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळाच्या सांगली येथील रा. ध. दावडा दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये झालेल्या बैठकीत प्रसिद्ध उद्योजक व विविध क्षेत्रात रचनात्मक योगदान देणारे भालचंद्र विरेंद्र पाटील यांची अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. ही निवड सभेच्या शाखांचे चेअरमन, सेक्रेटरी, कर्नाटक व महाराष्ट्रातील सभेच्या विविध विभागाचे पदाधिकारी यांचा समावेश असलेल्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळांने घटनेतील तरतुदीनुसार केली आहे. 

णमोकार मंत्राने बैठकीचे कामकाज सुरु झाले. प्रारंभी सभेशी संबंधित विविध क्षेत्रातील मयत व्यक्तींना णमोकार मंत्राने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दक्षिण भारत जैन सभेच्या माजी अध्यक्ष शरयूताईं दफ्तरी, मुंबई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

दक्षिण भारत जैन सभा ही गेली १२५ वर्षे जैन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्यरत आहे.या संस्थेच्या माध्यमातून स्व. रावसाहेब(दादा) आण्णासाहेब पाटील बोरगाव यांनी जैन समाजाच्या हितासाठी भरीव योगदान दिले आहे. स्व. रावसाहेब दादांच्या निधनानंतर दक्षिण भारत जैन सभेचे तत्कालीन केंद्रीय उपाध्यक्ष व रावसाहेब दादांच्या नेतृत्वाखाली सभेच्या कामात सक्रिय राहिलेले मा. भालचंद्र विरेंद्र पाटील यांची अध्यक्ष म्हणून गेल्या वर्षी निवड झाली होती.

सन २०२५ ते २०२८ या कालावधीकरीता पुन्हा पाटील यांची अध्यक्ष म्हणून मध्यवर्ती कार्यकारी मंडळाने निवड केली आहे. मध्यवर्ती कार्यकारी मंडळाच्या बैठकीत उपस्थित ७२ पैकी ६८ सदस्यांनी एकमुखी हात उंचावून या निर्णयाला मान्यता दिली. उर्वरित चार सदस्यांनी त्यांच्या निवडीचे अभिनंदनही केले. 

सभेच्या घटनेनुसार दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षांची निवड ही येणाऱ्या त्रैवार्षिक अधिवेशनापूर्वी दोन महिने आधी होणाऱ्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळाच्या बैठकीत होत असते. त्याप्रमाणे मध्यवर्ती कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये सभेच्या कर्नाटक विभागाचे आश्रयदाता ट्रस्टी अभिनंदन रावसाहेब पाटील यांनी भालचंद्र पाटील यांची अध्यक्षपदासाठी एकमताने निवडीची सूचना मांडली. त्याला सभेचे खजिनदार संजय शेटे यांनी अनुमोदन दिले. यावेळी मध्यवर्ती कार्यकारी मंडळाच्या उपस्थित सर्व सभासदांनी एकमताने हात उंचावून या निर्णयाला संमती दिली.

भालचंद्र पाटील यांनी गेली १५ वर्षे सभेच्या कार्यात चांगले योगदान दिले असून अध्यक्षपदी निवड झाल्यापासून गेल्या सहा महिन्यात त्यांनी कामाचा झंझावत तयार केलेला आहे आणि याचे स्वागत जैन समाजाने केलेले आहे. त्यांनी सभेचे दहा हजाराहून अधिक सभासद वाढविले. पुण्यासारख्या शहरात बोर्डिंग सुरू केले. समाजातील दारिद्ररेषेखालील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथमाचार्य शांतिसागर शैक्षणिक दत्तक शिष्यवृत्ती योजना राबवून यावर्षी सुमारे रु. २० लाखाचे वितरण करून सभा ही समाजातील वंचितांच्या शिक्षणासाठी भरीव योगदान देते हे दाखवून दिले.

त्यांच्या प्रयत्नांनी रु.२० लाखाहून अधिक परतीची शिष्यवृती रक्कमही वसुल झाली आहे. सभेच्या घटनेतील निकषाप्रमाणे मागेल त्याला सभासदत्व देवून सभेला व्यापक स्वरूप देऊन समाज सहभाग वाढवला आणि सभा समाजाभिमुख केली. सभेच्या विस्तारासाठी मुखपत्र प्रगती आणि जिनविजयचे रूप पालटवून, त्याचे वर्गणीदार वाढविले. मुंबईमध्ये सभेचे कार्यालय आणि वसतीगृह निर्माण करण्याचा त्यांनी संकल्प सोडला आहे. सभेच्या कामकाजामध्ये गतिमानता निर्माण करताना त्यांनी सभेच्या युवा कार्यकर्त्यांची एक भक्कम फळी निर्माण केली आहे.

दक्षिण भारत जैन सभेच्या माध्यमातून जैन समाजाची चौफेर प्रगती व्हावी म्हणून त्यांनी गेल्या वर्षी अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांच्या उद्योग आणि राजकारणाचा व्याप बाजूला ठेवून सभा भक्कम करण्यासाठी सभेच्या कार्यालयात ठाण मांडून कामाचा झंझावात सुरु केला. घटना दुरुस्ती करुन त्यांनी सभेचे कार्यक्षेत्र भारतभर राहील अशी तरतूद केली. सभेच्या कार्यात युवा वर्गाला समाविष्ट करून त्यांच्या क्षमतेचा उपयोग करुन घेण्याचा त्यांचा निर्णय जैन समाजाला हत्तीचे बळ देणारी ठरत आहे. सभा आपली आहे असे समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाटले पाहिजे अशी लोकशाही मार्गाने काम करण्याची त्यांची पध्दत ही समाज ऐक्याचे महत्व अधोरेखित करणारी आहे. भालचंद्र पाटील यांच्या अध्यक्ष पदावरील निवडीचे जैन समाजातील विविध स्तरातून स्वागत व अभिनंदन होत आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी एका धडाकेबाज व कर्तबगार व्यक्तीची निवड झाल्याबद्दल जैन समाजातून समाधान व्यक्त केले जात आहे.

मध्यवर्ती कार्यकारी मंडळाच्या या बैठकीस चेअरमन रावसाहेब जिनगोंडा पाटील, व्हा. चेअरमन दत्ता डोर्ले, मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील, खजिनदार संजय शेटे, सहखजिनदार अरविंद मजलेकर,उपाध्यक्ष शशिकांत राजोबा, ट्रस्टी अनिल बागणे, राजेंद्र झेले, शांतीनाथ नंदगावे, जयपाल चिंचवाडे, महामंत्री दादा पाटील चिंचवाडकर, प्रा. एन.डी.बिरनाळे, कमल मिणचे, विजया पाटील,मिलिंद फडे तसेच सांगली, कोल्हापूर, बेळगावी, हुबळी, पुणे, मुंबई, औरंगाबाद, अंबड विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.