विश्वकर्मा योजनेतील त्रुटी दूर करून जास्तीत जास्त लोकांना योजनेचा लाभ द्या - विजय जाधव

विश्वकर्मा योजनेतील त्रुटी दूर करून जास्तीत जास्त लोकांना योजनेचा लाभ द्या - विजय जाधव

कोल्हापूर - सर्वसामान्य नगारिकांना पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहेत. या योजनांच्या माध्यमातून गरिब नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारावी हाच सरकारचा उद्देश आहे. अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Yojana).  पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची ही महत्वकांक्षी योजना असून प्रत्येक गरजू आणि गरीब वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी सरकारनं ही योजना सुरु केली आहे. परंतु सर्व सामान्य व्यक्तीला या योजनेचा लाभ प्रत्यक्षात मिळण्यामध्ये अनेक त्रुटी निर्माण झाल्या आहेत. याच विषयात आज भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

सर्व प्रथम जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी या योजनेमध्ये शासन स्तरावर होणाऱ्या दिरंगाई बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर या योजनेतील अनेक त्रुटी जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडल्या यामध्ये प्रामुख्याने आधार अपडेट करूनही नाव रजिस्टर होत नाही, जुना डाटा डिलिट होत नाही, नोंदणी होऊन सुद्धा प्रकरण जिल्ह्याला पोहोचत नाही, ग्रामपंचायतीने ok करून सुद्धा पेंडिंग दिसते, मंजूर होऊन सुद्धा ट्रेनिंग कॉल येत नाही, ट्रेनिंग होऊन सुद्धा 15 हजार मिळत नाहीत, प्रकरणाचे पैसे बँकेत जमा होत नाहीत, बँक मॅनेजर सर्व्हे लावतात, सिबील स्कोअर विचारतात, quotation मागतात जे योजनेत अपेक्षित नाही, नोंदणी केलेला घरातील सदस्य प्रकरण मंजूर झाल्यावर मयत झाला असून त्यामुळे पैसे मिळणार नाहीत हे समजल्याने घरातील इतर सदस्याची नोंदणी करायला गेल्यावर ती घेतली जात नाही, ट्रेनिंग सेंटर प्रत्येक तालुक्याला सहज उपलब्ध नाही. असे अनेक प्रश्न उपस्थित केले. त्याचबरोबर या योजनेची नोंदणी केलेले परंतु अशा त्रुटिंमुळे प्रकरण प्रलंबित असणारे अनेक नागरिक याप्रसंगी उपस्थित होते. त्यांनी देखील आपल्या समस्या जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडल्या.

या  निवेदनाला उत्तर देताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भाजपाने दाखवलेल्या अंमलबजावणी  त्रुटीचा आढवा घेऊन या त्रुटी लवकरात लवकर दूर करून  नागरिकांना लाभ देण्यात येईल असे आश्वसन दिले. तसेच याविषयात पुढील आठवड्यात संबंधित सर्व अधिकाऱ्यांसोबत उच्च स्तरीय बैठक घेण्यात येईल असे सांगितले. 

यावेळी डॉ. आनंद गुरव असंडोलीकर, सुशीला पाटील, अर्जुन सुतार, नंदकुमार कीर्तीकर, महेश यादव, विराज चिखलीकर, महेश चौगले, लालासो पोवार, रविकिरण गवळी, संगम नेसरीकर, यांसह जिल्ह्यातील योजनेच्या प्रतीक्षेत असणारे अनेक नागरिक उपस्थित होते.