शिवद्रोही राहुल सोलापूरकरला त्वरित अटक करा : ठाकरे गटाची मागणी

शिवद्रोही राहुल सोलापूरकरला त्वरित अटक करा : ठाकरे गटाची मागणी

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून लाच देऊन सुटले अशाप्रकारे वाचाळ व असंबद्ध पद्धतीने मुलाखती हा तथाकथित व्याख्यानकार अभिनेता राहुल सोलापूरकर देतो. असे हे अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरला त्वरित अटक करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे  करण्यात आली आहे. 

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की , छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्रातील राष्ट्रपुरुषांचा वेळोवेळी अपमान करण्याची जणू काही एका पक्ष व त्यांच्या समर्थकांच्यामध्ये स्पर्धा सुरू असताना आपण अस काही बोललोच नाही असा पवित्रा घेत काही वाचाळ वीरांना सोयीस्करित्या सांभाळण्याचं धोरण काही पक्ष व त्यांचं नेतृत्व आहे हे दुर्दैवाने म्हणावं लागेल .ज्या शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची मुहूर्तमेढ रोवत हा महाराष्ट्र स्वाभिमानी बनवला ज्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक गोष्टी घटना या आजही नव्हे तर यापुढेही शतकोत्तर वर्षात सुद्धा अंगावर रोमांच उठवणाऱ्या व इतिहासाला साक्षीदार त्याचबरोबर  छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अंगावर रोमांच  उभा करणारा औरंगजेबाच्या तावडीतून अत्यंत शिफातीन व  मुत्सद्देगिरीने झालेली आग्र्याची सुटका असताना सुद्धा हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून लाच देऊन सुटले अशाप्रकारे वाचाळ व असंबद्ध पद्धतीने मुलाखती हा तथाकथित व्याख्यानकार अभिनेता राहुल सोलापूरकर देतो आणि त्याच्या या विधानाचा निषेध सुद्धा आक्रोश मोर्चे काढणाऱ्या हिंदुत्ववादी तथाकथित संघटना करत नाहीत. शासन त्याच्यावर कोणतीही कारवाई करत नाही . या अळीमिळी गुपचिळी पाठीमागे नेमकं शासनाचं व प्रशासनाचे काय धोरण आहे असा सवाल प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आला आहे. 

राहुल सोलापूरकर यांनी या प्रचंड जनप्रक्षोभ झाल्यानंतर व सर्व स्तरावर ती निषेधाची भूमिका महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने घेतल्यानंतर या वक्तव्याची माफी जरी मागितली असली तरी सुद्धा त्यांच्यावर हा द्रोहाचा गुन्हा नोंद झालाच पाहीजे .आपल्या अवाजवी बुध्दीची  दिवाळखोरी प्रदर्शित करत मुलाखतीमध्ये अथवा व्याख्यानामध्ये अशा प्रकारची वक्तव्य करून जर महाराष्ट्रातील शांतता अबाधित राहिलेली जर या तथाकथित पुरोगामी विचारवंतांना जर सहन होत नसेल तर मात्र यांच्याविरुद्ध कारवाईचा बडगा उचलणे अत्यंत गरजेचे बनलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या करवीर नगरीमध्ये राहुल सोलापूरकर यांचं कुठलंही व्याख्यान कुठल्याही संघटनेला अथवा संस्थांना यापुढे शिवसेना आयोजित करून देणार नाही. जोपर्यंत राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत शिवसेनेतर्फे सोलापूरकर यांचे प्रत्येक कार्यक्रम उधळून लावले जातील. असा इशाराही या पत्रकातून देण्यात आला आहे.