भरधाव कारने पदपथावर झोपलेल्या ९ जणांना चिरडले

भरधाव कारने पदपथावर झोपलेल्या ९ जणांना चिरडले

नागपूर प्रतिनिधी :  नागपूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे जिथे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने पदपथावर झोपलेल्या ९ जणांना चिरडले. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघाताचा थरार रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिघोरी टोल नाक्याजवळ झाला.

याप्रकरणी कारच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. कांतीबाई गजुड बागडिया (४२, करवली, बुंदी- राजस्थान) आणि सीताराम बाबुलाल बागडिया (३०) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर कविता बागडिया, सुमन बागडिया, सीना बागडिया, सकीना बागडिया, संमद खजूर बागडिया, बुरा हनुमान बागडिया, पानबाई मानसिंग बागडीया अशी जखमींची नावे आहेत.

या पदपाथावर मातीची भांडी विकणारे बंजारा कुटुंब झोपलेले होते. या कुटुंबात तीन महिला, चार मुले आणि एक पुरुष असे नऊ जण पदपाथावर झोपले होते. या नऊ जणांच्या अंगावरून कार गेली.