खांडेकर हे जीवनवादी लेखक : रवींद्र ठाकूर
![खांडेकर हे जीवनवादी लेखक : रवींद्र ठाकूर](https://majhamaharashtra.in/uploads/images/202502/image_750x_67ac3923d0d1f.jpg)
कोल्हापूर : वि. स. खांडेकर हे जीवनवादी लेखक होते असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक रवींद्र ठाकूर यांनी केले. ते शिवाजी विद्यापीठातील मराठी विभाग आयोजित डॉ. अनंत व डॉ. श्रीमती लता लाभसेटवार प्रन्यास प्रतिष्ठान अमेरिका पुरस्कृत वि. स. खांडेकर जयंती व्याख्यानमालेत ‘वि. स. खांडेकर यांचा जीवनवाद’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जीवनाविषयीचे प्रेम खांडेकरांच्या साहित्यातून जाणवते. खांडेकरांचे साहित्य आदर्श आणि प्रेरक स्वरूपाचे होते. खांडेकर हे लेखकांचे लेखक होते. त्यांच्या लेखनामुळे अनेकांना लेखनाची प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुनीलकुमार लवटे होते. ते आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की, खांडेकरांना पाश्चात्य साहित्याचे विपूल ज्ञान असूनही त्यांच्या लेखनीवर प्रमाण मराठीचा प्रभाव होता. खांडेकरांच्या साहित्यावर इंग्रजीचा प्रभाव दिसून येत नाही.
या कार्यक्रमात डॉ. अनंत लाभसेटवार यांनी या व्याख्यानमालेमागील आपली भूमिका आणि आपल्या जीवनावरील खांडेकरांचा प्रभाव सांगितला. मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. रणधीर शिंदे यांनी करून दिला. सूत्रसंचालन ज्योती वराळे तर आभार अमोल देशमुख यांनी मानले कार्यक्रमासाठी डॉ. अनिल गवळी, डॉ. गोमटेश्वर पाटील, डॉ. जयवंत दळवी, संशोधक विद्यार्थी, एम. ए.चे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.