उर्वशी रौतेलाने का मागितली सैफ अली खानची माफी? म्हणाली...

मुंबई: अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरून गेली. अनेकांनी तो बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली तर अनेजन्नी या घटनेनंतर बॉलीवुड मधील कलाकार सुरक्षित नाहीत अशी भावना व्यक्त केली.
या दरम्यान अभिनेत्री उर्वशी रौतेलाला या घटनेबद्दल प्रश्न विचारला जात असता, तिने मात्र तिचे महागडे घड्याळ, तिच्या सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन या गोष्टी फ्लाँट केल्या. यावरुन सोशल मीडियावर लोकांनी तिच्यावर जोरदार टीका केली, त्यानंतर अभिनेत्रीने लांबलचक पोस्टमधून माफी मागितली आहे.
उर्वशी रौतेलाचा तेलुगू चित्रपट 'डाकू महाराज' बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरल्याचा दावा केला जातोय. सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान तिने एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी सैफ अली खानवरील हल्ल्याबद्दल तिचे मत विचारण्यात आले, त्यावर अभिनेत्रीने ही 'दुर्दैवी घटना' असल्याचे म्हटले खरे, पण त्यानंतर तिने तिचे हिरेजडीत घड्याळ, रिंग वॉच आणि 'डाकू महाराज'चे १०५ कोटींचे कलेक्शन याविषयी बोलू लागली. नेटकऱ्यांनी यावरुन उर्वशीला ट्रोल केले असून, आता तिने माफी मागितल्याचे समोर आले आहे.
काय म्हणाली होती उर्वशी ?
ती असे म्हणाली होती की, 'हे अत्यंत दुर्दैवी आहे. आता "डाकू महाराज" सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १०५ कोटींचा आकडा पार केला आणि म्हणून माझ्या आईने मला हे हिरेजडित रोलेक्स भेट दिले, तर माझ्या वडिलांनी मला मिनी रिंग वॉच भेट दिले, पण आता आपल्याला या गोष्टी उघडपणे वापरण्यात आत्मविश्वास वाटत नाही. कोणीही आपल्यावर हल्ला करू शकतो अशी असुरक्षितता आहे. जे काही घडले ते अत्यंत दुर्दैवी होते.'
माफीनाम्यात काय म्हणाली उर्वशी ?
उर्वशीने लिहिले, 'प्रिय सैफ अली खान सर, मला आशा आहे की हा संदेश तुम्हाला धैर्य देईल. मी पश्चातापाच्या भावनेने आणि मनापासून माफी मागून लिहित आहे. आतापर्यंत मला तुम्ही तोंड देत असलेली परिस्थिती मला पूर्णपणे माहिती नव्हती. तुम्ही कोणत्या संकटातून जात आहात हे ओळखणे आणि समजून घेण्याऐवजी, डाकू महाराजांच्या यशाबद्दल आणि मला मिळालेल्या भेटवस्तूंबद्दल मी उत्साहित झाले, त्यातच हरवून गेले याची मला लाज वाटते. अज्ञानी आणि असंवेदनशील वागणुकीबद्दल माझी माफी स्वीकारा. आता मला या प्रकरणाचे गांभीर्य समजले, त्यामुळे मी खूप भावूक झाले असून माझा अढळ पाठिंबा देऊ इच्छिते.'
तिने पुढे लिहिले की, 'मला माझ्या पूर्वीच्या वागण्याबद्दल मनापासून पश्चात्ताप आहे आणि मी तुम्हाला खात्री देते की, माझे विचार आणि प्रार्थना आता तुमच्यासोबत आहेत. जर मी कोणत्याही पद्धतीने तुम्हाला मदत किंवा पाठिंबा देऊ शकणार असेल, तर कृपया मला कळवण्यास संकोच करू नका. सर पुन्हा एकदा माझ्या पूर्वीच्या उदासीनतेबद्दल मला खरोखर माफी मागते आहे. मी चांगले काम करण्याचे आणि भविष्यात नेहमीच करुणा आणि समजूतदारपणाला प्राधान्य देण्याचे वचन देते.'सध्या उर्वशीने सोशल मीडियावरुन ही पोस्ट हटवली आहे.